Protected by Copyscape Online Plagiarism Detector

Sunday, February 14, 2010

ते जीवघेणे काही सेकंद...


१९६२ सालचा ऑगस्ट महिना. सीमेपलिकडून चीनचा हल्ला होणार याची कुणकूण सर्वांना लागलेली होती. तो कुठून होणार, एखाद्या चकमकीपुरतीच त्याची व्याप्ती राहणार की तो सर्वांना युध्दाकडे घेऊन जाणार याचा अंदाज त्यावेळी बांधणं कठीण होतं. पण असा एखादा हल्ला झालाच तर तो थोपवण्यासाठीची शक्य ती सर्व तयारी आपल्या सैन्यानं सुरू केलेली होती.
त्याच दरम्यानची वॉलाँग ए.एल.जी.वरची नेहेमीसारखीच एक व्यस्त सकाळ. विमानं येत-जात होती; जवान, सामान, दारूगोळा यांची ने-आण सुरू होती. सकाळी उठून आपापली आन्हिकं उरकावीत इतक्या सहजतेनं जो-तो नेमून दिलेली कामं उरकत होता.
जोरहाटहून आम्ही अर्ध्या तासापूर्वी निघालो होतो. आता विमानातून वॉलाँगचा तळ दिसायला लागला होता. दोन बाजूंना काटकोनात उंचच्या उंच डोंगर, समोरच्या दोन बाजूंना तश्याच काटकोनांत खोल खोल दर्‍या आणि मधल्या थोड्याश्या सपाट जागेवर तात्पुरता छोटासा बेसकँप... बेसकँपसाठी ही जागा हेरणार्‍या आपल्या सैन्याचं कौतुक करावं तेवढं थोडं होतं. नाहीतर भयप्रद उंचीचे डोंगर आणि जीव दडपवणार्‍या खोल दर्‍यांच्या मधल्या त्या चिमुकल्या पठाराला कधी माणसांचे पाय लागले असते की नाही शंकाच आहे!
तिथून एखादं विमान उड्डाण करताना किंवा उतरताना दुरून कुणी बघत असेल तर त्याच्या पोटात गोळा यावा अशीच तिथली परिस्थिती होती. त्यामुळे या बेसवर आणि एकूणच कुठल्याही ए.एल.जी.वर विमानं आणण्याचं काम नेहेमीच अनुभवी आणि कसलेल्या वैमानिकांवर सोपवलं जाई. आमचा त्यादिवशीचा वैमानिक फ्लाईंग ऑफिसर सहाय हा अश्याच अतिशय कुशल वैमानिकांपैकी एक होता.
बेसकँपच्या पुढ्यातल्या धावपट्टीवर त्यानं आमचं विमान उतरवलं. बरोबर आलेले आर्मीचे जवान, त्यांचं सामान उतरवण्यात आलं. त्यापाठोपाठ सहायबरोबर आम्हीही उतरलो. त्यादिवशी विमान रोजच्यासारखं जोरहाटला परतणार नव्हतं. त्याऐवजी जवानांची अजून एक तुकडी दुसर्‍या एका ए.एल.जी.वर पोहोचवायची होती. त्या तुकडीची निघण्याची तयारी होईपर्यंत बेसवरच्या आर्मीच्या जवानांनी आमचा पाहुणचार करण्याची संधी साधली. त्यांची सरबराई पूर्ण होईपर्यंत पुढच्या तुकडीतले दहा जवान सामानासकट विमानात जाऊन बसलेले होते.
थोड्याच वेळात सहाय विमानात पुन्हा आपल्या जागेवर स्थानापन्न झाला... त्यानं इंजिन चालू केलं... अत्यंत कमी जागेत पण दोनतीन सफाईदार वळणं घेऊन विमान उलटं फिरवून पुन्हा उड्डाणासाठी तयार केलं... नेहेमीच्या तपासण्या करून सर्वकाही ठीकठाक असल्याची खात्री केली आणि विमानाचा वेग वाढवायला सुरूवात केली... विमान धावपट्टीवर पळायला लागलं...
कुठलंही विमान हवेत तरंगत राहण्यासाठी हवेतून कमीतकमी एका विशिष्ट वेगानं जावं लागतं. प्रत्येक विमानाच्या आकार-प्रकाराप्रमाणे हा वेग निरनिराळा असतो. तो सांभाळला तरच त्याचं वजन हवेत व्यवस्थित पेललं जातं. हवेतला हा कमीतकमी वेग मिळवण्यासाठी विमान आधी धावपट्टीवर धावतं आणि पुरेसा वेग मिळाला की हवेत झेपावतं. धावपट्टीची लांबी त्याप्रमाणात पुरेशी असते आणि साधारणतः धावपट्टीच्या निम्म्यापेक्षा जरा कमी अंतरातच विमान उड्डाण करतं...
पण त्यादिवशी आमच्या डोळ्यांसमोर काहीतरी अघटित घडत होतं! रोजच्या सवयीनं किती अंतरावर विमानाचा वेग पुरेसा होणार आणि कुठे विमान वर उचललं जाणार याचा आम्हाला नेमका अंदाज असायचा. पण त्यादिवशी मात्र त्या विशिष्ट वेगात, त्या विशिष्ट अंतरापर्यंत जाऊनसुध्दा विमान हवेत झेपावण्याची चिन्हं दिसेनात. आमच्या सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. अजून दोनतीन सेकंद गेले तरीही तेच! विमानाची चाकं अजूनही जमिनीवरच होती! ताशी दोनशे कि.मी.च्या वेगानं विमान झपाट्यानं दरीच्या दिशेनं निघालं होतं. आता मात्र आम्ही सगळे गर्भगळीत झालो. अजून काही सेकंद आणि विमान थेट दरीत कोसळणार होतं...
पण... विमान फ्लाईंग ऑफिसर सहायसारख्या ‘दादा’ माणसाच्या ताब्यात होतं. त्यानं ‘इंजिन पॉवर’ तर शून्यावर आणलीच पण अजून एक फार मोठा धोका पत्करून करकचून ब्रेक्स मारले...
मुळात, इतक्या वेगात जाणार्‍या विमानाला जोरदार ब्रेक्स मारणं अत्यंत धोकादायक असतं. चार चाकांवर पळणार्‍या कारलाही शंभर-सव्वाशेच्या वेगात असताना जोरदार ब्रेक्स मारले की काय अवस्था होते ते तुम्ही कधी ना कधी अनुभवलं असेलच. इथे तर दोन चाकांवरचं विमान होतं आणि ती चाकंही एखाद्या दुचाकीप्रमाणे पुढेमागे नाहीत तर शेजारीशेजारी!
वास्तविक, विमानाच्या दोन्ही चाकांना वेगवेगळे ब्रेक्स असतात आणि त्यांचा वापरही मर्यादितच असतो. पार्किंगपासून धावपट्टीपर्यंत ये-जा करताना, विमान वळवताना, जेव्हा विमानाचा वेग अगदी कमी असतो, फक्त तेव्हाच ब्रेक्सचा वापर केला जातो. उड्डाणाच्यावेळी मात्र ब्रेक्सचा वापर करणं अपेक्षित नसतं. कारण ब्रेक-पॅडल्स विमानाच्या सुकाणूला जोडलेली असतात. त्यामुळे दोन्ही चाकांच्या ब्रेकफोर्समध्ये जरा जरी फरक पडला तरी विमान धावपट्टी सोडून एका बाजूला पळायला लागतं. (याला विमान ‘स्विंग’ होणं असं म्हणतात.)... वॉलाँगच्या धावपट्टीच्या आजूबाजूला असं स्विंग व्हायला जागा होतीच कुठे? डावीकडे खोल दरी, उजवीकडे उंच पहाड... विमान डावीकडे स्विंग झालं असतं तर सर्वांचं मरण अटळ होतं; ब्रेक्स मारले नसते तरी समोरच्या दरीत मृत्यू आ वासून उभा होता. पण उजवीकडे स्विंग झालं असतं तर डोंगरावर आपटून विमानाची नासधूस जरी झाली असती तरी जवानांचे प्राण मात्र नक्कीच वाचले असते. आपल्या हातात आयुष्याची दोरी सोपवून निर्धास्तपणे विमानात चढलेल्या त्या दहा जवानांचे प्राण वाचण्याची ही पन्नास टक्के शक्यता गृहित धरून सहायनं करकचून ब्रेक मारण्याचा अत्यंत धाडसी प्रयत्न केला...
सहायच्या कौशल्यानं आणि सर्वांच्याच सुदैवानं विमान स्विंग वगैरे न होता धावपट्टीच्या अगदी टोकाला दरीच्या तोंडाशी जाऊन थांबलं.
काही मिनिटांत सहायनं विमान वळवून माघारी आणलं. भितीनं अर्धमेले झालेले जवान खाली उतरले आणि पाठोपाठ सहायही... रागानं त्याचा चेहरा लालबुंद झाला होता... विमान योग्य वेळी हवेत का झेपावलं नाही याचं कारण त्याला समजलं होतं...
त्यानं विमानात मागच्या बाजूला चढवलेलं सामान तपासलं. जवानांचं म्हणून असं फारसं सामान नव्हतं पण बसायच्या बाकांच्या खाली चटकन्‌ दिसू न शकणारी अशी चार लांबडी खोकी चढवण्यात आली होती. प्रत्येक खोक्यात तोफेची एक-एक नळी होती... प्रत्येक नळीचं वजन सुमारे दोनशे किलो...! म्हणजे जवानांसकट सुमारे दोन टन वजन विमानात लादलं गेलं होतं... ऑटरसारख्या विमानाच्या क्षमतेपेक्षा जवळजवळ दुप्पट! त्या आमच्या छोट्याश्या ‘एअरटॅक्सी’ला हा भार कसा पेलवणार? त्या खोक्यांच्या एकत्रित वजनाचा योग्य अंदाज कुणालाच आला नव्हता हे उघड होतं आणि त्यामुळेच ती विमानात चढवली गेली होती.
मुळात, ही खोकी आणि थोड्या सामानानिशी पाच जवान अश्यांनाच घेऊन जायचं होतं. नंतर जागा आहे म्हणून अजून पाच जवान चढले. पण ही छोटीशी चूक किती महागात पडली असती या विचारानं आमच्या जिवाचा थरकाप झाला. केवळ सहायच्या कौशल्यामुळेच हा जीवघेणा अपघात टळला होता...
दुर्दैवानं विमान दरीत कोसळलं असतं तरी ते कश्यामुळे हे कुणालाही कधीच कळलं नसतं. ‘विमानातील तांत्रिक बिघाड’ किंवा ‘वैमानिकाची चूक’ असा सरधोपट शिक्का बसून काही दिवसांतच हा प्रसंग विस्मृतीत गेला असता पण ज्या जवानांनी शत्रूला अस्मान दाखवायचं त्यांना आमच्या एका चुकीमुळे दुर्दैवी मरण आलं असतं या विचारानं आम्ही मात्र पुढे कित्येक दिवस अस्वस्थ होतो!
काम करताना, खास करून ए.एल.जी.वर काम करताना थोडंसुध्दा दुर्लक्ष करून चालणार नाही हा धडा आम्हाला आयुष्यभरासाठी मिळाला...
या प्रसंगानंतर विमानात सामान चढवताना आम्ही जातीनं लक्ष घालायला लागलो. लादल्या जाणार्‍या सामानाचं नेमकं वजन करण्यासाठी आम्ही मुद्दाम ‘स्प्रिंग बॅलन्स’ मागवून घेतले. कारण अंदाज फसवे ठरू शकतात हे सिध्द झालं होतं...
शिवाय, दरवेळेला दैव थोडंच बलवत्तर असणार होतं...
आणि दरवेळी वैमानिकाच्या जागेवर सहाय थोडाच असणार होता...!!

-----------------------------------------------------------

(माझे सासरे श्री. सदाशिव छ्त्रे हे भारतीय वायूसेनेतून ‘फ्लाईट सार्जंट’ म्हणून निवृत्त झाले. त्यांच्या आठवणीतला हा किस्सा.)

Wednesday, February 10, 2010

एक नदी, एक विमान आणि सहाजण


"हॅलो, ‘जे’ बेस, मी जॉलीबॉय बोलतोय. इमर्जन्सी आहे."
"हॅलो, जॉलीबॉय, बोल."
"मी वॉलॉंगहून १२ मिनिटांपूर्वी टेक-ऑफ केलंय. पण माझ्या विमानाचं इंजिन बंद पडलंय. मला ‘फोर्स लँडिंग’ची परवानगी हवी. मी आत्ता ब्रह्मपुत्रेच्या पात्रावरून उडत आहे. मी एकटाच आहे. विमानाची उंची आणि वार्‍याचा वेग पाहता १२-१३ मिनिटे ग्लाईड करू शकेन. कृपया मला परवानगी द्यावी."
"हॅलो, जॉलीबॉय, परवानगी आहे. मन आणि डोकं दोन्ही शांत ठेव. योग्य जागा पाहून सुरक्षितरीत्या लँडिंग कर आणि लगेच रिपोर्ट कर. शुभेच्छा."
... हा निरोप आमच्या युनिटला क्षणार्धात पोहोचला आणि एकच धावपळ सुरू झाली.
हा प्रसंग घडला होता १९६२ सालच्या एप्रिल महिन्यात. त्यानंतर पाचच महिन्यांत चीन आपल्यावर आक्रमण करणार याची पुसटशीही कल्पना आम्हाला तेव्हा नव्हती. पण सीमेवर सतत सुसज्ज आणि दक्ष राहण्याचं आपल्या सैन्याचं धोरण असल्यामुळे नेमून दिल्याप्रमाणे सर्वांची कामं चालू होती. मोठ्या विमानांतून ‘जे बेस’वर म्हणजे जोहराट विमानतळावर आलेले जवान, दारूगोळा आणि इतर सामान सीमेवरच्या ‘ऍडव्हान्स लँडिंग ग्राऊंड्स’वर पोहोचवणे आणि तिथून आणणे हे आमच्या युनिटचं मुख्य काम. सीमेलगत थोडासा सपाट प्रदेश पाहून तिथे आमची ‘ऑटर’ विमानं उतरवण्यासाठी लहानलहान ‘ऍडव्हान्स लँडिंग ग्राऊंड्स (ए. एल. जी.)’ तयार केलेली होती. अरुणाचल प्रदेशमधलं वॉलॉंग हे सीमेपासून ६-७ कि.मी.वर असलेलं असंच एक ए. एल. जी. होतं.
आमची विमानं सकाळीसकाळीच अतिदुर्गम भागांतल्या निरनिराळ्या ए. एल. जी.साठी रोजच्याप्रमाणे रवाना झालेली होती आणि साडेदहाच्या सुमाराला वॉलॉंगला सामान पोहोचवून परतताना फ्लाईट ऑफिसर भचु (जॉलीबॉय) याच्या विमानाचं इंजिन बंद पडलं होतं.
वॉलॉंग ते जोहराट हा सर्व मार्ग हिमालयाच्या दर्‍याखोर्‍यांतून जाणारा. त्यातल्यात्यात मोकळा मार्ग म्हणजे ब्रह्मपुत्रा नदीच्या प्रवाहाचा भाग. विमानाचं इंजिन बंद पडलं तेव्हा भचु या ब्रह्मपुत्रेच्या विस्तीर्ण पात्रावरूनच उडत होता. ‘फोर्स लँडिंग’ची परवानगी तर मिळाली पण विमान नदीच्या पात्रात कसं उतरवणार?... हा प्रश्न त्याक्षणी सगळ्यांच्याच मनात आला. पण आमच्यातली काही अनुभवी मंडळी मात्र निश्चिंत होती. ब्रह्मपुत्रेचं पात्र अतिविस्तीर्ण आहे हे खरंय. पण तेव्हा नदीला पूर नसल्यामुळे संपूर्ण प्रवाह लहानलहान ओढ्यांत विभागला गेलेला होता आणि मध्येमध्ये सपाट वाळवंटं (रिव्हर बेड्स) तयार झालेली होती. त्यांतल्याच एका वाळवंटावर भचु सुखरूप उतरू शकला. १५ मिनिटांत बेसवर तसा त्याचा निरोपही आला. सर्वांनी ‘हुश्श’ केलं. पण खरी परिक्षा पुढेच होती... आणि ती भचुला नाही तर आम्हाला द्यायची होती!
ते विमान परत ‘जे बेस’वर आणायचं म्हणजे तिथे जाऊन एक तर त्याचं बंद पडलेलं इंजिन दुरुस्त करायचं किंवा बदलायचं. त्यांतलं पहिलं काम तुलनेनं सोपं होतं. जोहराटला हेलिकॉप्टरचंही युनिट असल्यामुळे आमचे तंत्रज्ञ, हत्यारं, विमानाचे सुटे भाग तिथे सहज पोहोचू शकत होते. त्याप्रमाणे तंत्रज्ञांची एक तुकडी दुरुस्तीच्या सामानासकट दोन तासांत तिथे पोहोचली. आता प्रतिक्षा होती त्यांच्या ‘रिपोर्ट’ची. पण बरेच प्रयत्न करूनही इंजिन तिथल्यातिथे जाग्यावर दुरुस्त होऊ शकलं नाही. शेवटी ते बदलायचं असं ठरलं. सुमारे एक टन वजनाचं इंजिन आठ-दहा फूट उंचीवरून उतरवायचं आणि दुसरं उचलून त्याजागी बसवायचं म्हणजे एक दिव्यच होतं. पुरेसं मनुष्यबळ आणि सर्व सुविधा हाताशी असतानाही या कामाला साधारणपणे ६-७ तास लागत. आम्हाला मात्र ट्रॉलीज, क्रेन्स इ.च्या मदतीविनाच ते करायचं होतं... ते ही निर्जन अश्या ब्रह्मपुत्रेच्या पात्रात! साहजिकच त्यासाठी अचूक नियोजनाची आवश्यकता होती.
आमच्या युनिटमध्ये वेगवेगळ्या शाखांचे तंत्रज्ञ असले तरी युनिट छोटं असल्यामुळे एकमेकांची मदत करावीच लागायची. त्यामुळे सगळ्यांनाच सगळ्या प्रकारचं जुजबी तांत्रिक ज्ञान आपोआपच झालं होतं. त्यामुळे या कामासाठी एअरफ्रेम, वायरलेस या ट्रेड्सचा प्रत्येकी एकेक इंजिनियर, इलेक्ट्रिकल आणि इन्सटृमेंटचा मी आणि इंजिन ट्रेडचे दोन अशी आमची पाच जणांचीच एक तुकडी एका फिटर सार्जंटच्या नेतृत्वाखाली दहाबारा दिवसांच्या मुक्कामाच्या दृष्टीनं तयार झाली. सोबत तिथे राहण्यासाठी तंबू, आमच्या पोटापाण्याची काळजी वाहण्यासाठी एक आचारी आणि त्याचं छोटेखानी स्वयंपाकघर, पुलीब्लॉक, दोरखंड, इतर हत्यारं आणि मुख्य म्हणजे एक नवं कोरं इंजिन या सर्व जामानिम्यानिशी दुसर्‍या दिवशी भल्या पहाटे दोन हेलीकॉप्टर्सनी आम्हाला तिथे नेऊन सोडलं. भचुच्या विमानापासून थोडं दूर आणि जरा उंचावर आम्हाला उतरवून, शुभेच्छा देऊन हेलीकॉप्टर्स परत गेली.
भचुनं विमान जिथे उतरवलं होतं तो रिव्हर-बेडचा भाग बर्‍यापैकी मोठा होता आणि जवळचा किनारा अर्ध्या-पाऊण कि.मी.वर होता. सुदैवानं त्या किनार्‍यावर आर्मीचं एक छोटंसं युनिट होतं. इंजिनदुरुस्तीचा प्रयत्न करायला गेलेल्या जवानांनी तिथल्या आर्मीच्या जवानांच्या मदतीनं मोठाले तीनचार दगड आणि वासे आणून त्यांच्या साहाय्यानं विमानाला जखडून ठेवलेलं होतं. आम्ही तिथे पोहोचण्यापूर्वीच हत्यारं आणि सुटे भाग विमानातच ठेवून भचुसकट ते सर्वजण जोहराटला परतलेले होते.
तिथे उतरल्याउतरल्या पहिलं म्हणजे अन्न आणि निवारा यांची सोय करणं गरजेचं होतं. त्यामुळे आमचा आचारी लगेच स्वयंपाकाला लागला आणि आम्ही तंबू उभारणीला सुरूवात केली. पण तंबू उभारणीचा अनुभव इथे होता कुणाला? थोडंफार जुजबी ज्ञान जे ट्रेनिंगदरम्यान मिळालं होतं त्याचा मग आम्ही उपयोग करून घेतला. प्राथमिक माहितीच्या आधारानं आम्ही उभारलेला तो तंबू पुढच्या आमच्या तिथल्या संपूर्ण वास्तव्यात जोरदार वार्‍यातही टिकून राहिला हे विशेष! तंबूचं काम पूर्ण करून आचार्‍याच्या हातचं चविष्ट(!) जेवण जेवेपर्यंत दुपारचे दोन वाजून गेले. आता मात्र वेळ दवडून चालणार नव्हतं. उन्हाळ्याची सुरूवात होती; हिमालयातलं बर्फ वितळायला लागलेलं होतं. थोड्याच दिवसांत पूरपरिस्थिती निर्माण होणार होती. ब्रह्मपुत्रा नदीला वर्षातून दोनदा पूर येतो - एकदा पावसाळ्यात आणि एकदा उन्हाळ्यात. पावसाळ्यात पडणार्‍या पावसावरून पुराचा थोडातरी अंदाज बांधता येतो पण उन्हाळ्यात मात्र बघताबघता नदी रौद्र रूप धारण करते! त्यामुळे आमच्यासाठी प्रत्येक मिनिट महत्त्वाचं होतं. आम्ही लगेच कामाला लागलो.
विमान आणि आमचा तंबू यांमध्ये नदीच्या पाण्याचा एक पंधरा ते वीस फूट रुंद ओहोळ होता. विमानापर्यंत पोहोचायचं तर त्या पाण्यातून पलिकडे जावं लागणार होतं. आदल्या दिवशी येऊन गेलेल्यांनी ‘पाणी खूप गार आहे, जरा जपूनच जा’ असा इशारा दिलेला होता. त्याचा विसर पडून मी आपल्या नादातच पुढे सरसावलो. पण त्या ओहोळाच्या मध्यावरच माझे पाय इतके गारठले की पुढे जाताच येईना! हिमालयातल्या वितळलेल्या बर्फाचंच पाणी ते, मग दुसरं काय होणार? शेवटी अजून दोघांनी मला अक्षरशः ओढून पलिकडे नेलं. त्यादिवशी मग काही किरकोळ कामंच होऊ शकली.
दुसर्‍या दिवसापासून मात्र कामाला जोरात सुरूवात झाली. ‘ऑटर’ विमानाचं इंजिन पुढे त्याच्या नाकापाशी असतं जे जमिनीपासून आठदहा फूट उंचीवर असतं. तिथून ते टनभर ओझं उतरवायचं तर त्यासाठी पुलीची आवश्यकता होती आणि पुलीब्लॉक लावण्यासाठी बीम उभारण्याची गरज होती. मग आम्ही किनार्‍यावरच्या जंगलातून जेमतेम वीतभर जाडीची पण पंधरा-सोळा फुटी उंच, सरळसोट अशी लाकडं आणली. विमानाच्या पुढ्यातच तीनतीन खांबांची दोन तिकाटणी उभी केली. त्यावर एक लाकूड आडवं बांधलं आणि त्याला पुली ब्लॉक अडकवला... ही तीनचार वाक्यं नुसती वाचायला किती सोपी नाही? पण पुलीब्लॉक अडकवण्याचं हे एवढं एक काम करायला आम्हाला तब्बल दोन दिवस लागले आणि त्यातलाही अर्धा-अधिक वेळ हा जंगलात शोध घेऊन हवी तशी लाकडं तोडून आणण्यात गेला...! कारण लाकडं तोडण्यासाठी आमच्याकडे फक्त दोनच कुर्‍हाडी होत्या आणि त्यांपैकीही एक लहानच होती...
तिकाटण्यांचे पाय खाली वाळूत खचू नयेत म्हणून २-२ फूट खोल खड्डे खणून जरा घट्ट वाळू लागल्यावर त्यावर दगडगोटे टाकून ते पुरावे लागले. लाकडांवरून दोर घसरू नयेत म्हणून लाकडांवर खाचा पाडाव्या लागल्या. वरवर अगदी साध्या वाटणार्‍या या कामांनी तिथे आमचा अक्षरशः घाम काढला. पण या आणि अश्या कितीतरी ‘छोट्याछोट्या’(!) कामांत आम्हाला आर्मीच्या जवानांची खूप मदत झाली. त्यांच्यातले दोन जवान तर आमच्या मदतीला कायम दिलेलेच होते.
पुलीची मुख्य सोय तर झालेली होती. पुढचं काम होतं ते म्हणजे विमानाची ५-५ फूट लांबीची आणि प्रत्येकी ६०-६० किलो वजनाची तीन प्रॉपेलर ब्लेड्स खाली उतरवण्याचं! पाचवा दिवस बुडेबुडेपर्यंत ती ब्लेड्स्‌ आणि इतर कनेक्शन्स काढून इंजिन उतरवण्याची पूर्वतयारी आम्ही केली. आता चार बोल्ट्स काढले की इंजिन विमानापासून वेगळं होणार होतं...
सर्वसाधारण परिस्थितीत जे काम एक-दीड दिवसांत झालं असतं त्यासाठी आमचे पाच दिवस मोडले होते. पण तसंही, असाधारण परिस्थितीतच सैन्यातल्या जवानांची खरी कसोटी असते आणि हे काम आमची परिक्षा पाहणार याची कल्पना आम्हाला आधीपासूनच होती!
इंजिन त्या पुलीच्या खाली येईल अश्या रितीनं विमान आम्ही हळुहळू ढकलत आणलं आणि सहाव्या दिवसाच्या कामांना सुरूवात केली. इतरवेळी काँक्रिटवर २-३ माणसंही एका विमानाला सहज ढकलू शकत. पण इथे मात्र आम्हाला त्यासाठी खूपच कष्ट पडले. वाळूमुळे पायांना जोर मिळत नव्हता आणि विमानाची चाकंही वाळूत सहजी पुढे सरकत नव्हती. सर्वांनी अथक प्रयत्न करून विमानाला शेवटी हव्या त्या जागेवर पोहोचवलं. पुलीचा हूक इंजिनला अडकवून हळूहळू ते वजन पेलायला सुरूवात केली. पण इतकी काळजी घेऊनही तिकाटण्याचा एक खांब थोडासा खचतोय असं आमच्या लक्षात आलं. पुन्हा एकदा पुलीतून इंजिन सोडवून त्या तिकाटण्याचा पाया अजून भक्कम करावा लागला. मग दुसर्‍या प्रयत्नात मात्र काही अडचण आली नाही. इंजिनाचं पूर्ण एक टन वजन पुलीवर पेलून चारही बोल्ट्स काढून आम्ही इंजिन विमानापासून वेगळं केलं.
एका समस्येवर उपाय शोधून काम पुढे सरकवावं म्हणेपर्यंत पुढची समस्या हजर होती. विमान पुलीपासून पुन्हा थोडं मागे सरकवून इंजिन खाली उतरवण्याची तयारी तर झाली पण इंजिन वाळूत ठेवणार कुठे आणि कसं? कारण ते एक टनी धूड एकदा खाली टेकवलं की पुन्हा तिथून हलवणं कर्मकठीण गेलं असतं... पण आमच्या अनुभवी फिटर सार्जंटनं एक मोकळा इंजिन माऊंटींग बोर्ड आणि चार बोल्ट्स सोबत आणले होते. ‘जे बेस’वर सामान हेलिकॉप्टरमध्ये भरताना ‘आधीच सामान खूप झालंय, त्यात आणखी हा बोर्ड कश्याला, नव्या इंजिनला बोर्ड आहेच की’ वगैरे वगैरे आमचं बोलणं तो गालातल्यागालात हसत ऐकून सोडून का देत होता ते आता आम्हाला कळलं! दोन वासे आडवे ठेवून त्यांच्यावर तो बोर्ड ठेवला आणि ते जडशीळ इंजिन आम्ही कसंबसं उतरवलं. विमान हलवायचं तर त्याला निदान चाकं तरी होती. इंजिन घसटत लांब नेताना मात्र आम्हाला खूपच प्रयास पडले.
सातव्या दिवशी नवीन इंजिन बसवताना या सर्व क्रिया उलटक्रमानं पुन्हा एकदा करायच्या होत्या! त्याप्रमाणे ते इंजिन चार बोल्ट्स्‌च्या साहाय्यानं आपल्या जागेवर स्थानापन्न झालं. त्यावर प्रॉपेलर ब्लेड्स लावताना विशेष काळजी घ्यावी लागली. इंजिनाशी असलेला प्रत्येक ब्लेडचा कोन, त्यांचा आपापसांतला कोन हे सगळं सांभाळणं जरूरीचं होतं. बर्‍याच खटपटीनंतर ते काम पूर्ण झालं. (ब्लेड्स्‌ उतरवताना तुलनेनं सोपं गेलं होतं. कारण तेव्हा हा अलाईनमेंटचा प्रश्न नव्हता.) इतर सामग्री जागच्याजागी बसली आणि आठव्या दिवशी दुपारपर्यंत नवीन इंजिन टेस्टींगसाठी तयार झालं.
आम्ही तिथे उतरल्यापासून आमचा बेसशी संपर्क फक्त वरून जाणार्‍या एखाद्या विमानाद्वारेच होता. (कारण आमचे संदेश फक्त सरळ रेषेतच प्रवास करू शकत.) आमची इतर विमानं मात्र अधूनमधून खूप खालून उडून आमची ‘ख्यालीखुशाली’ पाहत होती. मधूनच बिस्किटाचे पुडे वगैरे आमच्या दिशेनं फेकत होती. तेवढाच आम्हाला दिलासा मिळायचा. दुरुस्ती सुरू असलेल्या विमानातली बॅटरी त्यामुळे तशी जपूनच वापरली गेली होती. तरीही फिटर सार्जंट पायलटच्या जागी विराजमान होऊन त्यानं जेव्हा इंजिन सुरू केलं तेव्हा भकाभक धूर ओकत ३-४ फेरे घेऊन ते पुन्हा बंद पडल्यावर आमचे चेहरे बघण्यासारखे झाले. आता कुठली नवीन समस्या आणि त्यासाठी अजून किती दिवस... ते कळेना! पण पुन्हा एकदा फिटर सार्जंटचा अनुभव कामाला आला. हे असं होणार याची त्याला कल्पना असावी बहुतेक. त्यानं आम्हाला ‘जरा थांबा’ अशी खूण केली. ४-५ सेकंदात इंजिन पुन्हा एकदा चालू झालं आणि आमच्या सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. इंजिन सिलेंडरमधलं प्रिझर्वेटिव जळून गेल्यावर धूरही जवळजवळ थांबलाच...
नवीन इंजिन व्यवस्थित सुरू झालं, आमची परिक्षा पार पडली! ज्या कामाला दहाबारा दिवस लागतील असं वाटलं होतं ते आम्ही आठ दिवसांतच पूर्ण केलं होतं! सर्वांनाच मोकळंमोकळं वाटलं आणि इतक्या दिवसांत प्रथमच आमचं आजूबाजूच्या परिसराकडे लक्ष गेलं. तो एक आगळावेगळा ‘पिकनिक स्पॉट’च वाटला आम्हाला त्यावेळी! एका बाजूला जरा लांबवर दिसणारा किनारा आणि दुसर्‍या बाजूला पार क्षितिजापर्यंत पोहोचलेलं ब्रह्मपुत्रेचं अथांग पात्र! मधूनमधून वाहणारे पाण्याचे प्रवाह, त्यांना दुभंगणारे वाळवंटाचे पट्टे! त्यांतल्याच एका बेटावर आमचा तंबू... जणू विमानानंच आम्ही पिकनिकला आल्यासारखं एका बाजूला ते विमान ‘पार्क’ केलेलं... थंड वारा, सूर्यास्ताची वेळ झालेली, शुक्लपक्ष संपत असल्यामुळे आकाशात चंद्रही दिसायला लागला होता... वाहत्या पाण्याचा मंजूळ आवाज आणि बाकी सगळं निःशब्द! आम्ही ७-८ दिवस तिथे होतो पण त्याआधी यातल्या कश्याचीच जाणीव आम्हाला झाली नव्हती! सगळेजण हे पिकनिक ‘एंजॉय’ करण्याच्या तयारीला लागले! मी मात्र रात्रीचं जेवण झाल्यावर अगदी निवांत, मोकळ्या मनानं चांदण्यात पाय मोकळे करून आलो.
नववा दिवस उजाडला तसे आम्हाला परतीचे वेध लागले. काम पूर्ण झाल्याचं ‘जे बेस’ला कळवलेलं होतंच. दुरुस्त झालेलं विमान परत न्यायचं तर गाडं ‘रन-वे’पाशी अडलं! ब्रह्मपुत्रेच्या भर पात्रातल्या त्या बेटावर ‘रन-वे’ कुठून पैदा करायचा? परिक्षा संपली तरी समस्या संपल्या नव्हत्या! मग जवळच्या आर्मी बेसवरचे मेजर आपल्या १५-२० जवानांसह तिथे आले आणि त्यांनी जमिनीवरची कोरडी वाळू बाजूला करून घट्ट ओल्या वाळूचा एक लांब पट्टा मोकळा केला. झाला आमचा ‘रन-वे’ तयार! इतर सामानाची आवराआवर करून रेल्वेच्या फलाटावर गाडीची वाट पाहत उभं रहावं तसे आम्ही हेलिकॉप्टरची वाट पाहत उभे होतो. जवानांशी गप्पाटप्पाही सुरू होत्या. थोड्याच वेळात हेलिकॉप्टरची घरघर ऐकू आली आणि पाठोपाठ ती उतरलीच. आमचं अभिनंदन करण्यासाठी खास आमचे ‘ऑफिसर-इन-कमांड’ आले होते. बरोबर फ्लाईट ऑफिसर भचुही होता विमान परत नेण्यासाठी.
आमचं सगळं सामान ‘रहने दिजिये साबजी...’ म्हणत आर्मीच्या जवानांनीच हेलिकॉप्टरमध्ये चढवलं. आर्मीच्या जवानांना एअरफोर्सच्या जवानांबद्दल अतीव आदर असतो... कित्येक वेळेला अगदी अवघडून जावं इतका! (‘रन-वे’ तयार करण्यासाठी येतानाही त्यांनी खास आमच्यासाठी म्हणून ‘इस्पेसल नास्ता’ आणला होता!!)...
त्यांना टा-टा करत आणि त्यांचा शिस्तबध्द टा-टा स्वीकारत आमचं हेलिकॉप्टर आकाशात झेपावलं.
आमच्यावर सोपवलेली एक फार मोठी जबाबदारी आम्ही यशस्वीरीत्या पार पाडली होती आणि त्यासाठी आम्ही जिथे ७-८ दिवस मुक्काम ठोकला होता त्या आमच्या ‘पिकनिक स्पॉट’कडे आमच्या नजरा पुनःपुन्हा वळत होत्या...
------------------------------------------------------------------------

(माझे सासरे श्री. सदाशिव छ्त्रे हे भारतीय वायूसेनेतून ‘फ्लाईट सार्जंट’ म्हणून निवृत्त झाले. त्यांच्या आठवणीतला हा किस्सा.)
(निवेदनाच्या ओघात या लेखात अनेक तांत्रिक बाबींचा उल्लेख आला आहे. पण त्याविना हे लेखन अर्धवट वाटलं असतं असं मला वाटतं. युध्दप्रसंगी किंवा इतर वेळीही सैन्यातल्या जवानांना किती प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढावा लागतो हे अधोरेखित करणं हा या लेखामागचा मुख्य उद्देश आहे.)
(५९ एल.ए.एस. स्क्वॉड्रन आणि फ्लाईट ऑफिसर भचु यांच्याबद्दल अधिक माहितीhttp://images.google.co.in/imgres?imgurl=http://www.bharat-rakshak.com/I... इथे मिळेल.)

एक काडी जी कधी पेटलीच नाही!


"छत्रे, तुमच्याकडे माचिस आहे का हो? "
आमचे ऍडज्युटंट फ्लाईट लेफ्टनंट भाकेलाल यांच्या या प्रश्नाने मी चकित होऊन त्यांच्याकडे पाहिलं. वास्तविक ते स्वतः सिगारेट न ओढणारे; मी ओढत नाही हे ही त्यांना ठाऊक होतं. तरीही त्यांनी माझ्याकडे काडेपेटीची मागणी का केली?
"... मला ती लागेल... वेळप्रसंगी विमानाला आग लावून द्यायला... पेट्रोल टाकीचे ड्रेन कॉक्स उघडून पेटती काडी आत टाकली तर विमान लगेच पेट घेईल ना? "
... काडेपेटीची मागणी, ती ही कसल्या भलत्याच कारणासाठी!!
कुठल्याही पायलटचं आपल्या विमानावर किती जिवापाड प्रेम असतं!... त्यालाच आग लावून देण्याचा विचार यांच्या मनात का यावा??
पण माझ्या चेहेर्‍यावरची प्रश्नचिन्हं वाचायला त्यांना सवडच नव्हती. नजर विमानाकडे पण मनात मात्र वेगळेच विचार चालू असणार त्यांच्या... मी अंदाज बांधला. त्यांना काय उत्तर द्यावं ते मला कळेना. पण त्यांचा चिंताग्रस्त चेहेरा पाहून मी गप्पच बसलो. त्यांनाही माझ्याकडून त्वरित उत्तराची अपेक्षा नसावी बहुतेक.
हा प्रसंग होता १९६२ सालच्या चिनी आक्रमणाच्या वेळचा. माझी नेमणूक त्यावेळी आसाममध्ये जोहराटला झालेली होती. आमच्या ५९-एल. ए. एस. (लॉजिस्टिक एअर सपोर्ट) स्क्वॉड्रनकडे ‘ऑटर’ जातीची विमानं होती. वजनाला हलकी, अगदी फुटबॉलच्या मैदानावरही उतरू शकतील अशी, पायलटसकट दहा जवान घेऊन जाण्याची क्षमता, वेळप्रसंगी आतल्या खुर्च्या दुमडून १ टनापर्यंत सामान नेण्याची किंवा जवानांना पॅराशूटच्या साहाय्यानं खाली उतरवण्याची सोय, गरज पडल्यास आमोरासमोर ‘३ टियर’ पद्धतीनं ६ स्ट्रेचर्स लावून अँब्युलन्ससारखाही उपयोग होणारी अशी ही बहुउद्देशीय विमानं! ‘एअर टॅक्सी’ हे त्या विमानांचं आम्ही ठेवलेलं टोपणनाव सार्थ ठरवणारी.
आमचा बेस-कँप जरी जोहराटला असला तरी एकूण १६ पैकी २-३ विमानंच तिथे असत. बाकीची सगळी २-२ किंवा ३-३ च्या गटांत पुढच्या सेकंड लेव्हल हवाई तळांवर कार्यरत असायची. डाकोटा, पॅकेट, ए एन-१२ सारख्या मोठ्या विमानांतून जोहराटला आलेले जवान आणि त्यांचं सामान त्या पुढच्या हवाई तळांवर नेऊन ठेवणे हे आमचं काम आम्ही त्या ऑटर विमानांच्या मदतीनं पार पाडायचो. तेवढंच नाही तर अगदी पुढे सीमारेषेजवळ फर्स्ट लेव्हल कँपवरही जवान आणि सामान पोहोचवायचं काम असायचं. सेकंड लेव्हल कँपला रस्त्यांमार्गे किंवा विमानांमार्गे जाण्याचा पर्याय उपलब्ध असतो. पण फर्स्ट लेव्हल कँपला मात्र फक्त विमानांनीच जावं लागतं. हे काम जास्त अवघड होतं. कारण हा सर्व मार्ग हिमालयाच्या दर्‍याखोर्‍यांतून जाणारा आहे. ऑटर विमानं बहुउद्देशीय असली तरी त्यांच्या काही मर्यादाही होत्या. त्यामुळे एखाद्या अगदी अरुंद गल्लीतून मोठी कार चालवणं जितकं कठीण तितकंच हिमालयाच्या शिखरांवरून या विमानांमधून प्रवास अवघड होता. पहाटे अगदी सूर्योदयाबरोबरच उड्डाणांना सुरूवात करावी लागे. कारण नंतर हवा जसजशी तापायला लागायची तसे दर्‍यांतून उलटसुलट जोराचे वारे वाहायला लागायचे (एअर टर्ब्युलन्स) आणि विमानं चालवणं अधिकाधिक कठीण होत जायचं. पण आमचे सगळेच पायलट अतिशय कुशल होते. त्यांना सगळ्या मार्गांची अगदी चांगली ओळख होती. त्यामुळे ना कधी कुणी वाट चुकला, ना कुठला अपघात झाला!
त्यादिवशीही आम्ही होतो सेकंड लेव्हल बेस कँपवर. नेहेमीप्रमाणे पहाटेच आम्ही सर्व विमानं उड्डाणांसाठी तयार ठेवली होती. आम्हाला त्या ‘पी बेस’वरून सीमेलगतच्या ‘टी बेस’वर जवानांना पोहोचवायचं होतं. सर्व तयारी होऊनही विमानं उडण्याची चिन्हं दिसेनात... कारण त्या बेसवरच्या आर्मी युनिटचा आमच्याशी असलेला संपर्क तुटला होता. सीमेलगत चिनी आक्रमक पुढेपुढे सरकत होते. आपले जवान तीव्र प्रतिकार करत असूनही त्यांना एक-एक ठाणे सोडून माघार घ्यावी लागत होती...
त्या ‘टी बेस’पासून सीमारेषा तर अवघी ६-७ कि. मी. वर!... काय झालं असेल तिथे?... संपर्क का होत नाहीये?... चिन्यांनी तिथे ताबा तर मिळवला नसेल? देव न करो, पण तसं जर असेल तर मग आपल्या तिथल्या जवानांचं काय?... सगळेच चिंताग्रस्त!
आमच्या कॅप्टननं तर आमच्या बेसचं संरक्षण करण्याच्या उद्देशानं २५ कि. मी. वर मोर्चेबांधणीचा निर्णय घेऊन उपलब्ध रस्त्यांमार्गे हालचाल सुरूही केली होती कारण आमचा बेसही सीमारेषेपासून फार काही लांब नव्हता... जेमतेम पन्नास-पंचावन्न कि. मी. अंतर होतं! त्यामुळे पुढच्या ‘टी बेस’वरच्या घडामोडी आम्हाला कळणं अतिशय निकडीचं होतं. संदेशवहनयंत्रणा कोलमडलेली असताना हे कसं काय जमवायचं?
मग आमचे फ्लाईट लेफ्टनंट भाकेलाल यांनी एक धाडसी निर्णय घेतला. आमच्या ‘ऑटर’ विमानांमधली संदेशयंत्रणा फक्त सरळ रेषेतच संदेश पोहोचवू शकत असे. त्यांनी ठरवलं की ५-५ मिनिटांच्या अंतरानं तळावर असलेल्या सर्व विमानांनी उड्डाणं करून तिथल्या दर्‍यांतून एक साखळी तयार करायची. प्रत्येक पुढच्या विमानानं मागच्या विमानाला माहिती द्यायची. सर्वात पुढे अर्थातच स्वतः भाकेलाल जाणार होते. पण, ‘टी बेस’ जर दुर्दैवानं चिन्यांच्या ताब्यात असता तर मात्र ते आयतेच त्यांच्या तावडीत सापडले असते. अश्यावेळी एक सुस्थितीतलं विमान तरी शत्रूच्या हाती लागू नये म्हणून वेळ पडल्यास त्याला आग लावून देण्याचा धाडसी विचार त्यांनी केला आणि माझ्याकडे काडेपेटीची मागणी केली...
सर्व पायलट तणावग्रस्त पण निश्चयी मनानं विमानांत चढले. एकापाठोपाठ एक हवेत भरार्‍या घेऊन दिसेनासे झाले. मागे बेसवर आम्ही सर्वजण निःस्तब्ध! आता पुढे काय होणार याची चिंता! साधारण पंधरा मिनिटांनी काहीतरी बातमी कळेल अशी अपेक्षा होती. ती पंधरा मिनिटं आम्हाला पंधरा तासांप्रमाणे वाटली. सगळेजण परत परत घड्याळ्यांकडे पाहत होतो. १५-२० मिनिटे उलटून गेल्यावर तर एकेकाचा धीरच खचायला लागला होता. आणि इतक्यात... भाकेलाल त्या बेसवर सुखरूप पोहोचल्याचा संदेश विमानांच्या साखळीमार्गे आमच्यापर्यंत येऊन पोहोचला! सगळ्यांनी रोखून धरलेले श्वास सोडले!
तिथे सर्वकाही ठीकठाक असल्याची खात्री करून भाकेलाल काही तासांत परतले. आमची त्यादिवशीची पूर्वनियोजित कामं नंतर - २४ तास उशिरानं - पार पडली. तोपर्यंत दोन्ही बेसदरम्यानची संदेशवहनयंत्रणाही सुरळीत झाली होती. नंतर ४-५ दिवसांनी बातमी आली की ‘टी बेस’वर चिन्यांचा हल्ला झाला पण आपल्या जवानांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. आम्ही वेळेत पाठवलेली कुमक उपयोगी पडली होती... जी आम्ही पाठवू शकलो होतो केवळ भाकेलाल यांनी धोका पत्करून त्वरित हालचाल केल्यामुळेच!!
त्यादिवशी ‘घेणार्‍यांनी’ दोन पेग जरा जास्तच घेतले!
जवानांच्या आयुष्यात असे प्रसंग वारंवार येतात. भराभर निर्णय घेऊन चालू क्षणातून मार्ग काढायचा आणि पुढच्या क्षणाला तोंड द्यायला पुन्हा सर्व ताकदीनिशी सज्ज व्हायचं ही सवयच होऊन जाते!
... किंवा करून घ्यावी लागते असं म्हणा हवं तर!

-----------------------------------------------------

(माझे सासरे श्री. सदाशिव छ्त्रे हे भारतीय वायूसेनेतून ‘फ्लाईट सार्जंट’ म्हणून निवृत्त झाले. त्यांच्या आठवणीतला हा किस्सा.)